८४९० हेक्टरवरील पिकांचे नुकसान, बळीराजा पुन्हा संकटात!
जळगाव: जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने आणि गारपिटीने शेतीचे अतोनात नुकसान केले आहे.
गुरुवारी सायंकाळी झालेल्या वादळी पावसामुळे जिल्ह्यातील तब्बल ४३० गावांमधील १३ हजार ४६६ शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील ८४९० हेक्टर क्षेत्र या अस्मानी संकटामुळे बाधित झाले आहे. यामध्ये मुक्ताईनगर, अमळनेर आणि चोपडा या तीन तालुक्यांमध्ये नुकसानीची तीव्रता सर्वाधिक आहे. मुक्ताईनगरमधील २६ गावांतील ४२५२ शेतकरी, अमळनेरमधील १२६ गावांतील ४०९४ आणि चोपडा तालुक्यातील ९७ गावांतील २९९२ शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
जिल्हा प्रशासनाने नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश दिले असून, बाधित शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई मिळावी यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. उभ्या पिकांसह चाऱ्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी वर्ग मोठ्या विवंचनेत सापडला आहे.

Post a Comment
0 Comments