![]() |
| महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ विठ्ठलवाडी बसस्थानक |
विठ्ठलवाडी (ठाणे ): महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ठाणे विभागातील रा. प. विठ्ठलवाडी आगाराने मे २०२६ च्या उन्हाळी हंगामात उल्लेखनीय कामगिरी करत आर्थिक यशाचे नवे शिखर गाठले आहे. प्रवाशांची उत्तम सेवा करत विठ्ठलवाडी आगाराने मे महिन्यामध्ये तब्बल १६ लाख ६८ हजार रुपये निव्वळ नफा (Profit) कमावला असल्याची माहिती आगार व्यवस्थापक श्री. राहुल विठ्ठल कुंभार यांनी दिली आहे.
मे २०२६ या एकाच महिन्यात आगाराच्या बसेसनी एकूण ६ लाख ७ हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला. या कालावधीत तब्बल २ लाख ९४ हजार प्रवाशांनी सुरक्षित प्रवासासाठी विठ्ठलवाडी आगाराच्या गाड्यांना पसंती दिली. या यशस्वी वाहतुकीतून आगाराला ३ कोटी ७४ लाख ७६ हजार रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले, तर या सर्व प्रक्रियेसाठी एकूण ३ कोटी ५८ लाख ८ हजार रुपये खर्च झाला. सर्व खर्च वजा जाता आगाराने १६ लाख ६८ हजार रुपयांचा नफा मिळवून ठाणे विभागात आपली ठळक ओळख निर्माण केली आहे.
कर्मचाऱ्यांच्या सामूहिक कष्टाचे फळ:
विठ्ठलवाडी आगाराला नफ्यात आणण्यासाठी आणि हा उन्हाळी हंगाम यशस्वी करण्यासाठी आगारातील चालक (Drivers), वाहक (Conductors), कार्यशाळा कर्मचारी (Mechanical Staff), प्रशासकीय कर्मचारी आणि पर्यवेक्षकीय अधिकारी यांनी अहोरात्र मेहनत घेतली. त्यांच्या या विशेष योगदानाबद्दल आणि उत्कृष्ट समन्वयाबद्दल आगार व्यवस्थापकांनी सर्व कर्मचाऱ्यांचे मनापासून आभार मानले असून त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
प्रवाशांनी दिलेल्या उत्तम प्रतिसादामुळे आणि आगारातील प्रत्येक कर्मचाऱ्याच्या प्रामाणिक कष्टामुळेच विठ्ठलवाडी आगार मे महिन्यात नफ्यात राहू शकला आहे.
भविष्यातही ही यशाची परंपरा अशीच सुरू ठेवून ठाणे विभागात तसेच संपूर्ण राज्यभरात विठ्ठलवाडी आगाराचा नावलौकिक वाढवण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध राहू."
असे प्रतिपादन श्री. राहुल विठ्ठल कुंभार (आगार व्यवस्थापक, रा. प. विठ्ठलवाडी आगार) यांनी केले.
महाराष्ट्र पल्स न्युज
संपादक श्री नवल परदेशी


Post a Comment
0 Comments